बाळ आणि बाळाच्या दोन आई !

भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारमध्ये अलीकडेच जो संघर्ष विकोपाला गेला आहे, त्यानंतर धन वापसी चळवळ अधिकच प्रासंगिक बनली आहे.

तुम्हाला राजाच्या दरबारात बाळ आपलं असल्याचा दावा करणाऱ्या दोघा आईंची गोष्ट आठवते का? त्यावर शेवटी राजा बाळाला कापून त्याचे दोन भाग करावेत, असे आदेश देतो. ज्यावरून खरी आई कोण, याची ओळख पटेल- कारण जन्मदात्री आपलं बाळ मरणाच्या दारात असल्याच्या वेदनेनेच घायकुतीला येईल…

भारताच्या बाबतही तसंच काहीसं होतंय, पण त्यात एक महत्त्वाचा फरक आहे. तो असा की, हे बाळ म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असणारे १० लाख कोटी रुपये राखीव रोख (कॅश रिझर्व्ह) रक्कम आहे. १० लाख कोटी रुपये ही किती मोठी रक्कम आहे! एक आकड्यानंतर तब्बल १३ शून्य येतात. त्यातून प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या वाट्याला ४० हजार रुपये येतील. ज्या दोन आई- त्याकरता भांडत आहेत, त्या आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भाजपप्रणित केंद्र सरकार. रिझर्व्ह बँक मातेकडे ते आहेत आणि सरकार मातेला ते हवे आहेत.

सरकार मातेला ते का हवे आहेत? अहो असं काय करताय, हे निवडणुकीचं वर्ष आहे. काही मतदारांना विकत घ्यायचंय, हो ना? प्रत्येक सरकार माता हेच तर करतं. शेवटी राजकारण्यांना काय हवं असतं, तर जे मतदार त्यांना मत देणार असतात, त्यांना काही पैसे देऊन खिशात टाकणं आणि त्या पैशातील मोठा भाग स्वत:करता राखणं.

त्यांनी याआधीच आयुर्विमा महामंडळ मातेला, नॅशनल स्मॉल सेव्हिग्ज फंड मातेला, ओएनजीसी मातेला आणि अशा कितीतरींना लुटलं आहेच. आता एकच माता उरली आहे, ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यासाठीच तर संघर्ष विकोपाला पोचला आहे. पण जसं मी आपल्याला याआधीच सांगितलं- कहानी में थोडा ट्विस्ट है|

हे दहा लाख कोटी रुपये यांपैकी कुणाचेच नाहीत. त्या माता नाहीत तर आया आहेत. खरी आई आहे ती म्हणजे भारतीय नागरिक. ही आपली संपत्ती आहे- हे आपलं अपत्य आहे – हे प्रत्येक भारतीय कुटुंबाची संपत्ती आहे.

मुर्ख बनू नका. हा संघर्ष रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यातील असला तरी तुम्ही जर यासंबंधी कृती केली नाही तर त्यात तुमचेच नुकसान होणार आहे. तुमचंच बाळ कापलं जाणार आहे.

तुम्हाला तुमच्या संपत्तीपासून, अभिव्यक्तीपासून आणि समृद्धीपासून वंचित ठेवणाऱ्या राजकीय पक्षांना आणि त्यांच्या एजंटांना तुम्ही रोखू शकता. त्याकरता कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या ७० कोटी व्यक्ती येत्या निवडणुकीत स्वातंत्र्य आणि समृद्धी याच मुद्द्यावर एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, त्याकरताच आम्ही धन वापसी नावाची चळवळ सुरू केली आहे. राजकारणी आणि नोकरशहांच्या तावडीतून आपली संपत्ती मुक्त करण्यासाठी हे करणे आवश्यक आहे, ज्यान्वये प्रत्येक भारतीय काही पिढ्यांनंतर नव्हे, तर लगेचच श्रीमंत होऊ शकतात.

धन वापसी चळवळीत सहभागी व्हा आणि आपणच निवडून दिलेल्या स्वतंत्र खासदाराला लोकसभेत पाठवा. आपण भारतभरातून ५४३ सर्वोत्तम व्यक्तींना शोधू शकतो. हे समृद्धीचे सरकार नंतर धन वापसी विधेयक संमत करून प्रत्येक भारतीयाला संपत्ती सुपूर्द करू शकेल आणि भारताला समृद्धीच्या मार्गावर नेऊ शकेल. धन वापसी हा पर्याय आहे. धन वापसी हे स्वातंत्र्य आहे. धन वापसी ही समृद्धी आहे.

तुम्ही हे घडवू शकता. तुम्ही नाही तर कोण करणार? आता नाही तर कधी करणार?

जय हिंद.